28/01/2024
#बरबाद_आयूष्याची_दंगल
पेटवलेलं गाव दुस-या दिवशी बी जळतं होतं..कुणी तरी राच्याला. गावच्या चौकात लावलेल्या झेंड्याजवळ दुस-या रंगाचा आणि दुष्मन देशाचा झेंडा लावला म्हणून गावात आवई उठवली. तसं रक्त सळसळलं, सळसळतं रक्त नसानसात भिनलेली पोरं पेटून उठली. तशी ही बातमी खालच्या आळीतल्या पोरांना आधीच कळाली होती. तशी ती 'चांदनगरात' पण पोहचली. खालच्या आळीतली पाच पन्नास घरातली तरणीबांड पोरं 'धर्मा बंडा पंतोजींना आपला गुरू आणि आदर्श मानायचे. पंतोजीने समाज रक्षणासाठी, तरूण पोरांची यादीच तयार केली. पंतोजीने एक एक नाव घ्यायला सुरवात केली शंक-या...., सुखदेव..., खंडू....बंडू....बाळ्या.... परसू..... आण्णा.... भावड्या. इ. पोरांना आदेश दिले. प्रत्येकाला कामं वाटून दिली. कुणी कोठून घुसायचं याचा नकाशा तयार करून दिला. मोहीमेला निघण्यापूर्वी दोन शब्द जेष्ठत्वाच्या नात्याने बोलण्यासाठी धर्मा बंडा पंतोजी उभा राहीले....माझ्या समाज रक्षक मुलांनो, रक्षणाचं खुप मोठं काम मी आज तुमच्या पदरात टाकतोय. तुम्ही यात नक्कीच यशस्वी व्हाल याची मला खात्री आहे. खरंतर ही मोहीम फत्ते करण्यात मी माझ्या मुलगा 'चिन्मय आणि अद्वैत' यांना मनापासून सहभागी करू ईच्छित होतो परंतू एक महीन्यापूर्वी ते अमेरीकेला उच्च शिक्षणासाठी निघून गेले. याच मला खरंच मनापासून खुप दु:ख होत आहे...असो. आज जरी ते अमेरीकेत असले तरी ते तेथे राहून. आपल्या समाज रक्षणाच्या कामात ते हिरीरीने भाग घेत असतील...याची मला खात्री आहे ! तसेच चंपकशेठने आज या कार्यासाठी मोफत रॉकेल व मिरची पावडरचे पोते दिलेले आहे. त्यांचे मी आपल्या सर्वांच्या वतीने आभार मानतो....!
ईकडे चांद नगरमध्ये खालच्या आळी सारखीच परीस्थिती होती. चांद नगरातले सगळेच "शहेनशहा खुर्रम शेठच्या", घरासमोरच्या भल्या मोठ्या पटांगणात जमा झाले होते. तरणीबांड आणि सटकर पोरं राकेल, मिरचीचा बुकणा, काठ्या घेवून खुर्रमशेठच्या आदेशाची वाटं बघतं होते.... 'कौम खतरे' म्हणतं खुर्रम शेठने भाषणाला सुरवात केली..... 'जगात आणि देशात समाजावर किती अन्याय अत्याचार होतोय. याचा पाढाच खुर्रमशेठने वाचायला सुरवात केली...तशी तरूण पोरांचे रक्त खवळं, पोरं फुरफूराय लागली, डोळ्यात रक्त उतरलं, चुन चूनके मारेंगे म्हणतं पोरंं निघाली...!
खालच्या आळीतली आणि चांद नगरातली पोरं लहानपणापासून एकत्र वाढली, एकाच शाळेत शिकली, काल पर्यंत कॉलेजला एकत्र शिकत होती. पण....दोन झेंड्याच्या वादात आख्या गावात रान पेटलं..!
दोन्ही पार्ट्यानी एकमेकांची चौकातली काही दुकानं आणि काही घरं पेटवली. जिवीत हानी झाली नाही पण बरेच जण जखमी झाले. जिल्ह्यावरून रातोरात पोलीस फोर्स आला. पेटवलेलं गाव दुस-या दिवशी जळतं राहीलं. आख्यागावात कर्फ्यू लागला, दिसलं तिथं पोलीस आणि बघलं तिथं एसआरपी होती. आख्या गावात मानसं कमी आणि पोलीस जास्त दिसू लागली. पोलिस तपास करून दोन्ही पार्ट्यांच्या पोरांना हुडूकून चड्डी फाटूस्तर तर काहींना मुतूस्तर ठोकू लागली.
"खुर्रमशेठ आणि बंडापंतोजी या सगळ्या कार्यात प्रत्येक्षात कुठंच सहभागी नव्हते त्यामूळे ते आपआपल्या किल्ल्यात सुरक्षीत होते !"
खालच्या आळीतली आणि चांद नगरातली मिळून शंभरीक पोरांवर गुन्हा दाखल झाला. पोलीसांनी हागूस्तर पोरांची मनसोक्त धुलाई केली. त्यानंतर दिड दोन महिन्यांनी सगळ्याच पोरांचा जिल्ह्याच्या कोर्टातून जामीन झाला. "समाज रक्षण आणि कौम खतरेमे", म्हणना-या पोरांना कोर्टाने जिल्हा बंदीचे आदेश दिले. जिथे होते त्या जवळच्या पोलीस स्टेशनला रोज हजरी लावायचे आदेश होते.
नंतर सलग कित्येक वर्ष, शंभर कीलो मिटरवर असलेल्या जिल्हा कोर्टात दर महीन्यातून दोनदा तारखीला हजर राहावे लागायचे. कोर्टात तारखेला जाण्यायेण्यासाठी दोन्ही पार्ट्याकडे पैशाचे वांदे असायचे. दोन्ही पार्ट्यातली पोरं एकत्र येवून एक टॅम्पो ठरवायचे. एकाच टॅम्पोत गाण्याच्या भेंड्या खेळत जायचे. गावातल्या काही व्यापारी मंडळी कडून तर काही प्रतिष्ठीत मंडळीकडून वर्गणी जमा करायचे. कित्येकांना वर्गणी मागीतली तर, 'आले भिकारी म्हणून हिणवायचे.' काहींची हालाकीची परीस्थिती असायची. तरी जर कमी पैसे पडले तर मग प्रत्येकाच्या खिशातले काही पैसे जमा केले जायचे. दोन्ही पार्ट्या घरून भाजी भाकरी बांधून जिल्हा कोर्टात तारखीला हजर राहायचे. दुपारच्या भर उन्हाच्या का-हात, कौम आणि धर्म खतरेमे म्हणनारे एकत्र झाडाखाली बसून गोळ्यामेळ्यांनी जेवायचे. नळकोंडाळ्यावर पाणी पिवून, पुढची तारीख घेवून परतायचे.
शेवटी सात ते आठ वर्षांनी कोर्टाने गोळ्यामेळ्याने दोन्ही पार्ट्या एकत्र येतात, एकत्र राहतात, एकत्र जेवतात... ! हे त्यांच्यातले अतीप्रेम पाहून. परत साक्षीदारांनी गावच्या हितासाठी आणि पोरांच्या भल्यासाठी साक्षी दिल्याने आणि जप्त मुद्देमालात, जप्त केलेला झेंडा कोर्टासमोर आल्यानंतर तो दुष्मन देशाचा झेंडा नसून. 'साधं ईरा गेलेलं फडकं होतं', हे निष्पन्न झाल्याने ! सगळ्यांच दंगलीतल्या आरोपींना दंगलीच्या गुन्ह्यातून मे. कोर्टाने निर्दोष मुक्त केलं !
याच दरम्यान कित्येकांना सरकारी नौकरीचे कॉल आले. कित्येकजण पोलीस भरती होवू पोलीस ट्रेनिंगला जाण्याच्या तयारीत होते. तर ब-याच जणांनाची केस चालू राहील्याने नौकरीचे वय निघून गेले. त्यातील काहीं जणांनी वडिलोपार्जीत शेती व व्यवसायात लक्ष दिले. तर काही जणांनी छोटा मोठा व्यवसाय टाकून प्रगती केली. पण यातील बरेच जण जे सरकारी नौकरीत रुजू होणार होते. ज्यांना कौम खतरेमे आणि समाज संकटात सापडला असे वाटल्याने दंगलीत सामील झाले. ते सरकारी नौकरीस कायमचे मुकले. मग ते आपल्या हातून झालेल्या चुत्यागत चुकीचा पश्चतापाचा विचार करत शेवटी 'सोमरसाच्या' प्रेमात पडले आणि सोमरसाबरोबर कायमची मैत्री करून बसले....!
#बाकी
बंडापंतोजी आणि शहनशहां ए खर्रमशेठ आलीशान पध्दतीने जिवन जगत आहेत आणि दोघांचे मुलं नातवंडे अमेरीकेत सेटल झालेले आहेत...पण दोघे आजही गळ टाकून बसलेले असतात...चुकून कोणी गळाला लागला तर... त्यांची अफूची गोळी आजही तयार असते !
Cr अ़ॅड. दिपक ना. शामदिरे पुणे/आष्टी.