05/12/2025
दत्त जयंतीच्या निमित्त्याने
🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸 कलियुगामध्ये सकारात्मक ऊर्जा पुरवीत, आपल्या अस्तित्वाची साक्ष देत, भक्तांना कायम आधारभूत असलेल्या दत्त प्रभूंची ,त्यांचे भक्तगण ध्यान, धारणा, जप, गुरुचरित्र पारायण, दत्तधाम यात्रा इत्यादि विविध प्रकारे ,यथाशक्ती मनोभावे उपासना करीत असतात,त्यांना आळवीत असतात.
स्तुतिस्तोत्र पठण, भजन, कीर्तन, गायन हे पण सेवाचेच प्रकार! तेव्हा शास्त्रीय संगीतातील राग प्रणालीच्या अनुषंगाने केलेली, ही शब्द फुलांची गुंफण म्हणजे, मनात उमलत जाणाऱ्या त्या भक्तीचीच खूण का मानू नये???
हळूहळू फुलत जाणाऱ्या या भक्ति फुलोऱ्यात, भौतिक सुखविवर्जीत अशा सात्विक दत्तकृपेची अभिलाषा असणे हे पण काही गैर नव्हेच.
🌸🌸🌸🌸🌸
संगीत सेवा
🌸🌸🌸🌸🌸
दत्त सख्या गुरुराया देवा
अर्पण चरणी संगीत सेवा||धृ||
मेल थाट हा मंगल्याचा
शांत भक्ति अन् प्रेम रसाचा
भाव जयातच समर्पणाचा
राग 'नामजप' मान्य असावा||१||
नितांत श्रद्धा वादि जयाचा संवादी तो सातत्याचा
वर्ज्य स्वर नित अहंकाराचा
सिद्ध मंत्रजप श्रवण करावा|२||
राग असे हा मिश्र जातीचा
अनवट परि हो पावित्र्याचा
षड्ज लावता तल्लिनतेचा 'स्मर्तृगामी तू' अनुभव द्यावा|३||
सुख आरोही क्षय दुःखाचा
ध्यानधारणा विस्ताराचा
राग समय श्वासोश्वासाचा
आळवणीचा स्विकार व्हावा||४|
लय ताला स्तव मणि माळेचा आवर्तन दे मोद समेचा
हृदयी घुमता नाद परेचा
दुजाभाव तो विलया न्यावा||५||
स्थाइ -अस्थाई उपासनेचा
छंदच जडला समरसतेचा
हेतु भाबडा अनुभूतीचा
दर्शन देऊन पूर्ण करावा||६||
🌸🌸🌸🌸🌸🌸🌸
ह.भ.प. सौ .अंजली जोशी. डोंबिवली.
8591534300
गुरुवार .०४|११|२०२५
==============
विवेचन
शास्त्रीय संगीत जाणकारांना कवितेतील शब्द फुलांचा गंध सहज जाणवेल ,पण पुष्पगुच्छ किंवा पुष्पहाराची रचना करतांना रंगसंगती व समतोल रचना जशी महत्त्वाची तसे शास्त्रीय संगीतातील संज्ञांच्या अर्थाची नेमकी भावनांशी गुंफणही महत्त्वाची!! म्हणून हा थोडा खुलासा इतरांसाठी.
शास्त्रीय संगीतात जे स्थान राग गायनाचे तेच स्थान व महत्त्व दत्तगुरूंच्या सेवेत नामजपाचे. संगीतातील रागांचे काही नियम असतात ,
नामजप सुद्धा शिस्तबद्ध व नियमानुसारच व्हायला हवा.
*कुठलाही राग जसा ठराविक स्वरांच्या मेल किंवा थाटातूनच उत्पन्न होणारा व रसोत्पादक, तसा "नामजप" हा मांगल्यातून उपजणारा व भक्ती प्रेम आणि शांत रस निर्माण करणारा.
* तीळमात्रही अहंकार भगवंताला सहन होत नाही त्यामुळे नामजप रागात अहंकाराचा स्वर पूर्णतः वर्ज्य.
रागातील महत्त्वाचा स्वर वादी त्या खालोखाल संवादी तद्वत
नितांत श्रद्धा आणि सातत्यानेच जप पुढे सिद्ध मंत्र बनतो.
* रागात येणाऱ्या स्वरसंख्येनुसार रागाच्या ओडव, षाडव ,संपूर्ण किंवा मिश्र अशा जाती, तसेच पंचाक्षरी षडाक्षरी दशाक्षरी इत्यादी प्रकार जपाचे. षड्ज लावताच येणारी तल्लीनता सुरुवातीच्या ओंकार उच्चारणाने येऊ शकते व दत्तप्रभूंच्या स्मर्तुगामीपणाचा अनुभव येऊ शकतो.
अर्थात ही सेवा किंवा उपासना प्रसन्नता देणारी असली ,तरी सरसकट सगळ्यांनाच रुचेल असे नाही ना! नास्तिक वृत्तीच्या लोकांना माहित नसलेली किंवा अप्रचलित असलेली, संगीतातील काही राग अनवट असतात ना तसाच हा प्रकार
* नामजपात सुख चढत्या क्रमाने म्हणजे आरोही तर दुःख उतरत्या क्रमाने जाणारे म्हणजे क्षयी किंवा अवरोही. आलाप ताना घेत घेत रागाचा विस्तार तसा ध्यान धारणेंनी नाम जपाचा विस्तार .
*राग नियमित समईच गायचा जप मात्र श्वासोश्वासात गुंफायचा
* संगीतात जेवढे महत्त्व लय तालाला तेवढेच महत्व जपात हाती घेतलेल्या माळेला. माळेचा मेरू मणी आला की जणू तालातील महत्वपूर्ण मात्रा म्हणजे सम गाठत तालाचे एक आवर्तन पूर्ण झाल्याचा आनंद
* संगीतातील स्वर असो वा नामातील शब्द असो परावाणीतून नाद हृदयात घुमणे महत्त्वाचे. तोच तर देवाला प्रिय असतो.
* रागातील बंदिशीचा पूर्व भाग स्थाई /अस्थाई, खालच्या आवाजातील मंद्र वा मध्य सप्तकात गावा नामजपाची उपासनाही हळूहळू शांत चित्ताने
व्हावी ती आक्रमक किंवा उच्च स्वरात नसावी.
* एखादा राग समरसून तल्लीन होऊन आळवावा अगदी तसेच या "नामजप " रागाचे नियम असावेत. शास्त्रशुद्ध पद्धतीने नामजप करता करता केवळ अनन्यतेचा आणि दत्तप्रभूंच्या कृपेचा लाभ व्हावा तशी अनुभूती यावी ही मागणी अवाजवी ठरू नये.
🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸
सौ अंजली जोशी डोंबिवली
८५९१५३४३००
==========